| 7742 |
40449680 |
श्री हूमड़ जैन समाज पुणे |
|
|
*“नुतन संसारांची पायाभरणी – श्री सन्मती सेवा दलाचा प्रेरणादायी वधू–वर मेळावा”*
वधू–वर मेळावा म्हणजे नात्यांच्या विश्वातला एक सुंदर पूल, जो दोन हृदयांना, दोन कुटुंबांना आणि दोन भविष्यांना प्रेमाने जोडतो.
विवाह हा केवळ एक विधी नसून दोन मनांची, दोन कुटुंबांची आणि दोन जीवनप्रवासांची सुंदर सुरुवात असते. हा प्रवास विश्वास, प्रेम आणि समजुतीच्या पायावर उभा राहावा, यासाठी वधू–वर मेळावा ही आजच्या काळाची अत्यंत महत्त्वाची गरज बनली आहे.
आजच्या वेगवान आणि डिजिटल युगात माणसे एकमेकांच्या अगदी जवळ असूनही मनाने दूर जात आहेत. अशा वेळी वधू–वर मेळावा हा असा मंच आहे, जेथे माणुसकी, संवाद आणि संस्कार पुन्हा एकदा केंद्रस्थानी येतात. प्रत्यक्ष भेटीतून व्यक्तिमत्त्व, विचार, स्वभाव आणि संस्कार समजतात. त्यामुळे नाते केवळ माहितीवर नव्हे, तर भावनांवर आणि विश्वासावर उभे राहते.
वधू–वर मेळावा वेळ, पैसा आणि मानसिक ताण यांची मोठी बचत करतो. दलाल, महागड्या मॅट्रिमोनियल साईट्स, फसवणूक किंवा सततच्या चौकशांपासून मुक्त ठेवणारी ही व्यवस्था पारदर्शक व विश्वासार्ह आहे. येथे प्रत्येक कुटुंब आपली माहिती स्वतः सादर करीत असल्याने विवाहाचा पाया प्रामाणिकतेवर घातला जातो.
या मेळाव्यांचे सामाजिक महत्त्वही फार मोठे आहे. अनेक सामाजिक संस्था नफा न घेता, केवळ समाजहिताच्या भावनेतून हे मेळावे आयोजित करतात. त्यामुळे विवाह सुदृढ होतात आणि समाजातील ऐक्य, सलोखा व सुसंवाद वाढतो. समान संस्कार, संस्कृती व मूल्यांवर विश्वास ठेवणारी कुटुंबे एकत्र येतात आणि सुदृढ, समतोल व आनंदी जीवनप्रवासाची सामूहिक सुरुवात होते.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, वधू–वर मेळाव्यात तरुण-तरुणींना स्वतः आपला जीवनसाथी पाहण्याची, बोलण्याची, समजून घेण्याची व निवडण्याची मोकळीक मिळते. त्यामुळे विवाह हा दबावातून नव्हे, तर समजूतदारपणा, आपुलकी आणि सहमतीतून घडतो.
अशाच उदात्त विचारांतून आणि निःस्वार्थ सेवाभावाने श्री सन्मती सेवा दल बहुउद्देशीय अल्पसंख्याक संस्था, अकलूज ही संस्था दर दोन वर्षांनी वधू–वर मेळाव्याचे यशस्वी आयोजन करते. या संस्थेचे संस्थापक माननीय श्री मिहीर गांधी आणि त्यांचे समर्पित सहकारी एकजुटीने, प्रामाणिकपणे आणि समाजहिताच्या भावनेने हा उपक्रम राबवितात. त्यांच्या या कार्यामुळे अनेक तरुणांचे संसार मार्गी लागले असून असंख्य कुटुंबांच्या आयुष्यात आनंदाची पहाट उजाडली आहे. अशा समाजोपयोगी कार्यासाठी श्री सन्मती सेवा दलाचे मनःपूर्वक अभिनंदन व कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.
अकलूज येथील कांतीलाल सांस्कृतिक भवनमध्ये दिनांक २५ जानेवारी, २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेला वधुवर मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्यात विविध जिल्ह्यांतून आलेल्या सुमारे ३४० पेक्षा अधिक युवक आणि २६० पेक्षा अधिक युवती आणि त्यांच्या पालकांनी सहभाग नोंदविला.
उद्देश: समाजातील योग्य वधू-वर परिचयासाठी एक सुरक्षित व सुसंस्कृत व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा असतो.
श्री सन्मती सेवा दला तर्फे ९ वा राज्यस्तरीय वधु-वर मेळावा खूपखूप उत्तमरीत्या पार पडला.
सर्व मान्यवरांचे स्वागत: पारंपरिक पद्धतीने हलगीच्या गजरात करण्यात आले.
मंगलाचरण: सन्मती महिला मंडळाने आपल्या सुस्वरात मंगलाचरणाने केली.
मंचाचे उद्घाटन: प्रसिद्ध व्यापारी आणि समाजसेवक, मा. श्री. सुहास शहा, कुर्डूवाडी (उपाध्यक्ष, सराफ असो. सोलापूर जिल्हा) यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. भगवान महावीर आणि प्रथमाचार्य शांतीसागर महाराजांच्या फोटोचे अनावरण आणि पुष्प अर्पण, दीप प्रज्वलन: उपस्थित प्रमुख अतिथी, सर्व मान्यवरांच्या हस्ते वधु-वर मेळावाच्या पुस्तिकाचे अनावरण
स्वागत सत्कार: शाल आणि श्री सन्मती सेवा दलाचे स्मृतिचिन्ह आणि पंचरंगीदुपट्टा भेट देऊन.
प्रास्ताविक: श्री सन्मती सेवा दल अल्पसंख्याक, अकलूज संस्थेचे संस्थापक –अध्यक्ष मा. श्री मिहीर बाहुबली गांधी यांनी संस्थेच्या स्थापनेपासून ते आजतागायत पार पडलेल्या आणि सुरू असलेल्या कार्याचा थोडक्यात आढावा घेत कार्यक्रमाची प्रस्तावना केली. तसेच या सर्व कार्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभागी कार्यकर्त्यांचे कार्य आणि या कार्यास आर्थिक पाठबळ देणाऱ्या दातारांचे मन:पूर्वक आभार मानताना त्यांना झालेला आनंद हा त्यांच्या आनंदाश्रूंनी अधोरेखित केला.
सर्व उपस्थित मान्यवरांचे मार्गदर्शन
* डॉ. रावसाहेब पाटील: आपला जीवनसाथी किती शिकलेला आहे, किती पैसा कमवतो आहे, कोणत्या शहरात राहतो, याची शाहनिशा अधिक न करता वधु-वर संस्कारक्षम आहेत की नाहीत, आपल्या कुटुंबात समरूप होणारी आहे का, हे अग्रक्रमाने पाहावे. हीच आजच्या काळाची खूप मोठी आवश्यकता आहे. आपला जोडीदार आपल्यावर विवाहोत्तर काळात आपल्यावर प्रेम करणार का, प्रत्येक सुख-दु:खात आपल्या पाठीशी उभे राहणार का, यांसारखी आश्वासने घेऊनच विवाह करावेत असे मत मांडले आणि खरे तर आजच्या काळात हे अत्यावश्यकच आहे, असे म्हटले तर काहीच वावगे ठरणार नाही.
* सौ. निवेदिता श्रेयांश: वधु-वर मेळाव्यात विवाह जुळणे हे खूपच योग्य आहे, हे त्यांनी आपल्या अनुभवाद्वारे अगदी सहजतेने आणि सोप्या शब्दांत स्पष्टपणे मांडले. आपला जोडीदार हा सुस्वभावी, प्रामाणिक, संस्कारी, आपल्या जीवनात पावलोपावली साथ देणारा असावा. असा जोडीदार निवडला तर तो आणि ती पण आयुष्यात यशस्वी होणारच, असे स्पष्ट मत मांडले. आईवडिलांप्रति आदर ठेवा. एकमेकांच्या आईवडिलांनाही प्रेम देणे हे दोघांचेही कर्तव्य असेल. सर्वांनी ध्यान करावे असाही संदेश दिला.
* मा. सुजाताताई शहा: व्यक्तीची पहिली शाळा, पहिली संस्कारशाळा आणि पहिला भावनिक आधार म्हणजेच कुटुंब; मात्र विभक्त (न्यूक्लिअर) कुटुंबपद्धती वाढली आहे. आई–वडील आणि एक-दोन मुले एवढ्यापुरतेच कुटुंब मर्यादित झाले आहे. त्यामुळे भावनिक संवाद कमी होत चालला आहे. घटस्फोट, पुनर्विवाह, सिंगल पेरेंटिंग यांसारख्या संकल्पना समाजात हळूहळू स्वीकारल्या जात आहेत. विवाह आता “आयुष्यभराची बांधिलकी” न राहता “परस्पर समजूत, समानता आणि भावनिक समाधान” यावर आधारित नाते बनत चालले आहे. त्यामुळे अपेक्षा वाढल्या आहेत आणि तडजोडीची क्षमता कमी होताना दिसते.
या बदलत्या परिस्थितीत पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. आज गरज आहे ती कुटुंबसंस्थेचे नाते केवळ “सहवास” न ठेवता “संवाद” आधारित करण्याची.
पालकांनी मुलां-मुलींच्या निवडीचा आदर करणे; पण त्याचबरोबर अनुभवाच्या आधारे मार्गदर्शन करणे हीसुद्धा समतोल भूमिका ठेवावी. दबाव, भावनिक ब्लॅकमेल किंवा सामाजिक भीतीमुळे निर्णय लादणे हे आजच्या काळात अपायकारक ठरते. विश्वास, संवाद आणि समजूत या त्रिसूत्रीवर पालक–मुलांचे नाते आधारित असावे. “लग्न जुळवणे ही पालकांची जबाबदारी; पण नातं टिकविण्याचे शिक्षण देणे ही त्याहून मोठी जबाबदारी.” असे मत मांडून विवाह पूर्णपणे यशस्वी व्हावा यासाठी वधु-वर तसेच पालक यांचीही जबाबदारी अधोरेखित केली.
* मा. श्री. सुहास शहा: या संस्थेने मागील १६ वर्षांत ९ वेळा वधु-वर मेळावा घेतला आणि एवढेच नाहीतर, या संस्थेमार्फत अगदी शिस्तबद्ध पद्धतीने सम्मेद शिखरजी स्वच्छता अभियान, वैद्यकीय सहकार्य, शैक्षणिक सहकार्य, रक्तदान शिबीर यांसारखी अनेक कार्ये तळमळीने पार पडतात. आपण प्रथम जैन आहोत हे लक्षात ठेवून, जैन धर्मातील कोणत्याही जाती-उपजातींचा विचार न करता विवाह करण्यास स्वपरिवारातील उदाहरणाद्वारे प्रोत्साहित केले. कुटुंबातील व्यक्तीची गणती न करता व शहर-गाव यांचा विचार करण्यापेक्षा एकत्र कुटुंबाचे महत्त्व आणि खेडेगावातील सुबत्ता, शुद्ध हवामान याचेही महत्त्व अधोरेखित केले. तसेच आजच्या आधुनिक दळणवळणच्या सुविधांमुळे गावे आणि शहरे खूप जवळ आली आहेत. घरातील ज्येष्ठ नागरिकांचे महत्त्वही स्पष्ट केले, आजी-आजोबा जे संस्कार मुलांना देऊ शकतात ते संस्कार पाळणा घरात केले जात नाहीत. “विवाह म्हणजे तडजोड आहे; तडजोड म्हणजेच आयुष्य”, असे मत मांडले.
आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, जैन समाजातील विवाहसंस्था टिकवून ठेवण्यासाठी श्री सन्मती सेवा दलाचे उत्साही व समर्पित संस्थेचे कार्यकर्ते वधु-वर मेळाव्यातून आहोरात्र प्रयत्नशील असतात, त्याबद्दल त्यांचे कौतुक सर्वच मान्यवरांनी आवर्जून केले. तसेच सौ. निवेदिता श्रेयांश यांनी तर मा. मिहीर गांधी हे स्वतःच जैन समाजासाठी एक ब्रँड आहेत, असे त्यांच्या कार्यास साजेसे मत मांडले.
यानंतर पालवी संस्था, पंढरपूर येथील एड्सबाधित बालक-बलिकांनी सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून त्रिशलादेवीची स्वप्ने अतिशय सुंदर रीतीने सादर केले. यात सौ. मंगलताई शहा आणि सौ. डिंपलताई घाडगे यांचे कार्य कौतुकास्पद आणि अभिनास्पद आहे, यात काहीच दुमत नाही. अनेक मान्यवरांनी या संस्थेस बक्षिसे प्रदान केली.
यानंतर वधु-वर परिचयाचा मुख्य कार्यक्रम अगदी व्यवस्थित, शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला. खूपच सुंदर आणि भव्यदिव्य मेळावा पार पडला. पालक व युवक-युवतींना थेट संवाद साधण्याची संधी देण्यात आली.
श्रेष्ठदान रक्तदान: श्री सन्मती सेवा दलाने वधु-वर मेळाव्याबरोबरच “श्रेष्ठदान रक्तदान” चेही आयोजन केले होते. यालाही अनेक तरुणांनी प्रतिसाद देत ५१ जणांनी रक्तदान करून पुण्यार्जन केले.
अनेक पालकांनी अशा उपक्रमांमुळे विवाह प्रक्रिया अधिक सुलभ व सन्मानजनक होत असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
अकलूजचे नूतन नगरसेवक सयाजीराजे यांच्या शुभहस्ते संस्थेच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.
या वधूवर मेळाव्यास सदिच्छा भेट महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते- पाटील, मा. बाळदादा मोहिते पाटील, मा. शिवबाबा मोहिते पाटील.
आभार प्रदर्शन: श्री प्रथमेश कासार यांनी सर्व मान्यवर आणि श्रावक- श्राविकांचे आभार मानले आणि कार्यक्रमाची सांगता केली.
“तुमच्यासारखा मित्रपरिवार आम्हाला लाभला हे आमचे भाग्याच. तुमच्याशिवाय हा कार्यक्रम साजरा झालाच नसता. तुम्ही दिलेल्या लाखमोलाच्या
शुभेच्छांबद्दल धन्यवाद!!! श्री सन्मती सेवा दलाचे संस्थापक, पदाधिकारी आणि सर्व कार्यशील कार्यकर्ते सहपरिवार.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालनः श्री प्रथमेश कासार, सौ. तनुजा शहा, सौ. सारिका गांधी आणि श्री शशिन चंकेश्वरा
लेखन – संकलन संध्या काटकर (जैन), हडपसर, पुणे |
|
2026-02-17 18:32:29 |
|